पालिकेत समाविष्ट गावांतील मूलभूत समस्या तशाच; आश्वासने हवेत विरली
फुरसुंगी – फुरसुंगीसह लगतची गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर शहराच्या कचरा डेपोचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाची होती. याउलट हा प्रश्न तर रेंगाळलेलाच आहे. शिवाय, पालिकेत समावेशानंतर या भागातील मूलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत. येथील समस्यांबाबत खासदार, आमदार यांच्यासह 11 गावांच्या नगरसेवकांची हाताची घडी तोंडावर बोट आहे. निवडणुका आल्या की, सार्वजनिक सोयीसुविधा देण्याच्या नावाने गळा काढणारे कोठे गेले, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
फुरसुंगीसह लगतच्या परिसराचा समावेश पालिकेत करण्यात आला आहे. याच भागाने 11 गावांसाठी नगरसेवक निवडून दिले. परंतु, येथील रस्ते, चेंबर, स्ट्रीट लाईट आदी मूलभूत विकासकामेही झालेली नाहीत. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने आता हवेतच विरून गेली आहेत.
हडपसर-सासवड मार्गावर गाडीतळ ते मंतरवाडी, उरुळी देवाची दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. चेंबर तुटले आहेत, पावसाचे पाणी तुंबत आहे.
हडपसर गाडीतळ ते भेकराईनगर चौकदरम्यान सायकल ट्रॅकवर वाहने उभी केली जात आहेत. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हडपसर, उंड्री, पिसोळी, कोंढवा, फुरसुंगी, मंतरवाडी, उरुळी देवाची आदी ठिकाणचे अंतर्गत रस्ते उखडले आहेत. यासह पाणीपुरवठा, वीजप्रश्न अशा मूलभूत सुविधा मार्गी लागण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल नागरिक करीत आहेत.
रस्ता रुंदीकरणाच्या जागेत अतिक्रमण…
हडपसर-सासवड रस्ता राष्ट्रीय प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी जुन्या झाडांची बिनदिक्कत कत्तल करण्यात आली. मात्र, रस्ता रुंदीकरणाचे काम झाले नाही. याउलट या जागी आता फेरीवाले, दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याची चर्चा आहे.