वाघोली (प्रतिनिधी): दि. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झाले आहे त्याच पद्धतीने वाघोली तालुका हवेली येथील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने एका व्यक्तीच्या दुर्दैवी अंत तर वाघोली मधील काही भागातील सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. हे पाणी काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, महसूल विभाग यांनी तातडीने नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी वाघोली चे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
वाघोली चे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले की वाघोली मध्ये ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचले आहे अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीने पाणी काढून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्यावर साचलेले पाणी देखील काढून रस्ते देखील खुले करण्यात आले आहेत. मात्र शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहावयास मिळत आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने ते त्या ठिकाणी देखील आर्थिक नुकसानीचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन यांनी नागरिकांना पंचनामे करून तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करीत आहे.
वाघोली चे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी याबाबत सांगितले की दि. 14 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती वाघोली मध्ये पाहायला मिळाली या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी तातडीने मदत करून पुणे- अहमदनगर रस्ता वाहतूक कोंडी मुक्त केला आहे. तसेच नागरिकांचे प्राण वाचविण्यात देखील ग्रामस्थांनी योगदान दिले.
वाघोली मधील अनेक वार्डमधील लहान-मोठ्या सोसायट्यांमध्ये, घरांमध्ये, तसेच अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी, ग्रामस्थ, सोसायटी धारक यांना तातडीने शासनातर्फे मदत मिळवून देण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, खासदार अमोल कोल्हे,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व जिल्हा प्रशासनाकडे ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा सुरू केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे अशी मागणी दाभाडे यांनी केली आहे.