सिडनी – परदेशी संघ जेव्हा ऑस्ट्रेलियात दाखल होतो त्यावेळी ते मिडीया स्ट्रॅटीजी करुन संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. ही त्यांची कृती काही नविन नाही याचाच प्रत्यय आता भारतीय संघाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नव्हे तर मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा हाच कसोटी मालिकेत सर्वात धोकादायक फलंद ठरेल, असे विधान ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने केले आहे.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वगळता कोहलीने कौटुंबीक कारणाने अखेरच्या तीन सामन्यांतून माघार घेतली आहे. मात्र, तरीही त्यांची भीती कमी झाल्याचे हेझलवूडच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. कोहलीपेक्षा आम्हाला पुजारला लवकर बाद करणे महत्वाचे आहे. मोठा डाव खेळण्याची त्याची क्षमता त्याने सातत्याने सिद्ध केली आहे. त्यातच तो गेली काही वर्षे इंग्लंडमध्ये खेळत असल्याने त्याला वातावरणातील बदलांचाही चांगला अनुभव आहे. सध्या ऑस्ट्रेलियात इंग्लंडसारखेच थंड वातावरण असल्याने तोच आमची डोकेदुखी ठरेल, असेही हेझलवूडने सांगितले.
थेट प्रक्षेपण…
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होत आहे. या मालिकेतील सामने सोनी टेन 3 या वाहिनीवरून पाहता येणार आहेत. 17 डिसेंबर रोजी सुरु होणारा कसोटी सामना भारताचा परदेशातील पहिलाच दिवस-रात्र सामना ठरणार आहे.
कोहलीपेक्षा पुजाराला लवकर बाद करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाने आमचा आमच्याच देशात पराभव केला होता. त्या मालिकेत पुजाराने चार कसोटी सामन्यात 74.42 च्या सरासरीने 521 धावा केल्या होत्या. त्यामुळे यंदा त्याला लवकर बाद करण्यासाठीच आम्ही रणनिती आखत आहोत, अशा शब्दात हेझलवूडने मीडिया स्ट्रॅटीजी देखील सांगितली.
बुमराह निर्णायक ठरेल…
या मालिकेत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वात जास्त निर्णायक ठरेल. याचे स्विंग व यॉर्कर चेंडू जगभरातील बलाढ्य फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेले आहेत. त्याच्या गोलंदाजीतही फसवा वेग आहे. त्याची शैली जरी साधी व संथ वाटत असली तरीही त्याचे यॉर्कर बेफाम वेगाचे असतात त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांसाठी त्याची गोलंदाजी खेळणे कठिण ठरू शकते, असेही हेझलवूडने सांगितले.