मुंबई : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवाच, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले. मराठी भाषा मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विभागातंर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनाबाबत यावेळी सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आदी उपस्थित होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या सदस्यांची 03 नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज सर्व सदस्यांची बैठक पार पडली.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, मराठी भाषा विभागाने मागील दोन वर्षात अनेक चांगले उपक्रम राबविले. मराठी भाषेचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांचा कायदा केला. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी देखील कायदा केला. आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. याशिवाय दुकानांच्या पाट्यांचे निरीक्षण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले.
मराठीचे संवर्धन करणाऱ्यांना आपण जोडून घेतले पाहिजे. मुंबई आणि तंजावर या शहरातील सांस्कृतिक आणि भाषिक देवाण-घेवाण झाली पाहिजे. मराठी भाषा विभागाचे उपक्रम जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्यांना याद्वारे सर्व माहिती उपलब्ध होईल, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.