इस्लामपूर (प्रतिनिधी) : शहरातील कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी २ ते १० सप्टेंबर अखेर जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला. दूध व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. इस्लामपूर शहरातील विविध व्यापारी संघटनां,राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी ही घोषणा केली.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील ,मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, राष्ट्रवादीचे नगरसेवक शहाजी पाटील, शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
प्रांताधिकारी पाटील म्हणाले,” कोरोनाच्या समूह संसर्ग वाढण्याची गंभीर परिस्थिती उदभवली आहे.म्हणून हा निर्णय घेत आहोत. फक्त दुकाने बंद असेल असे नाही तर घरी बसा हे महत्वाचे आहे.सर्वांना अडीचणी आहेत. आपत्तीला सामोरे जायला हवे. नगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांच्या साठी वॉर रूम, फिवर क्लीनिक सुरू केले जात आहेत. आरोग्य विभाग सर्व प्रयत्न करीत आहे. आतां साखळी तोडण्यासाठी सर्वानुमते जनता कर्फ्यू करीत आहोत.”
मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी प्रास्ताविक केले. शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी स्वागत केले.
माळी म्हणाले,” ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे. जेष्ठ नागरिक यांचा कोविड पासून बचाव करण्याचा आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.लवकर निदान झाले तर उपचार लवकर मिळतील. मास्क, सोशल डीस्टन्स पाळायला हवा.”
नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले,” सध्या २५६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरात परिस्थिती गंभीर आहे. १३ जणांचे मृत्यू झाले आहेत. आजपर्यंत ३५९ रुग्ण झाले आहेत.समूह संसर्ग सुरू आहे तो रोखण्यासाठी रुग्ण संख्या ० वर आली पाहिजे. यासाठी ही बैठक घेवून जनता कर्फ्यू बाबत आज सर्वांची मते जाणून घेतली. शहराच्या हितासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.”
शहाजी पाटील म्हणाले ,शहरातील काही रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यात आहेत. यांची माहिती संकलित करावी.आनंदराव पवार म्हणाले,” नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी शहरात जनता कर्फ्यू करण्या संदर्भात भूमिका घेतली आहे.”
बी. जी. पाटील म्हणाले,” संशयित रुग्ण, बाधीत रुग्ण व त्यांचे घरचे लोक यांना बंधने हवीत. सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घ्यायवा हवी आहे. साखळी वाढत आहेत. बधितांच्या वाढत्या संख्येला सामोरे जावू. प्रशासनाचा ताण कमी करावा.
कापड व्यावसायिक गौतम रायगांधी म्हणाले,” शहरात सध्या लॉक डाऊन गरजेचा आहे. आम्ही त्याला पाठींबा देऊ.”
हॉटेल असोसिएशनचे अरुण कांबळे म्हणाले,” सामान्य माणसाला अडचणी आहेत. लॉकडाऊन उपयोग होणार का ? आठ दिवस वाट बघू अन्यथा आम्ही व्यवसाय सुरू करणार.” बांधकाम व्यावसायिक संघटना पदाधिकारी तुळशीदास पटेल म्हणाले, ” लॉक डाऊन कडक पाहिजे. शहराच्या सीमा बंद व्हायला हव्यात.”
मसाले व्यवसायिक सलीम कच्ची म्हणाले,“शहराचे आरोग्य डबघाईला आले आहे. आर्थिक दृष्ट्या तालुका अडचणीत आहे. भाडे द्यावे लागत आहे.”
विजय महाडिक म्हणाले,” जनजागृती करायला हवी. २० टक्के लोकांमुळे सर्वांना अडचणी आहेत. भाजी मंडई, व्यापार पेठेत सोशल डिस्टटिग नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करा.”
वंचित आघाडीचे शाकिर तांबोळी म्हणाले, रोजंदारी करण्याची अडचणी समजावून घ्या.”संघर्ष समिती सदस्य महेश पाटील,दीपक पाटील ,अशोक खोत यांनी भूमिका मांडल्या. सनी खराडे, अजित पाटील, संजय हवालदार ,सदानंद पाटील उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे विजय पवार म्हणाले,” प्रशासन व राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा आमच्यावर लादू नका. सर्व सामान्य आणि राज्यकर्त्यांना कायदा वेगळा आहे का? इस्लामपूर शहर कोरोना मुक्त झाल्यावर तुम्ही गाजावाजा केला. जिल्ह्यातील मृत्यूची जबाबदारी तुम्ही घ्या. अनेकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.”