नवी दिलली -भारताने बऱ्याच परकीय ऍपवर बंदी घातल्यानंतर पब्जी या कंपनीनेही भारतातील गाशा गुंडाळला होता. आता या कंपनीने पब्जी मोबाइल इंडियाच्या माध्यमातून भारतामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
भारतीय सार्वभौमत्व, एकात्मता आणि संरक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल या शक्यतेमुळे सप्टेंबर महिन्यात भारत सरकारने पब्जीसह 118 मोबाइल ऍपवर बंदी घातलेली आहे. पब्जी मुळात दक्षिण कोरियाच्या कंपनीकडून विकसित करण्यात आले असून चीनमधील कंपनीच्या माध्यमातून भारतातील व्यवहार केले जात होते.
आता चीनमधील कंपनीशी मूळ कंपनीचा कसलाही संबंध नसल्याचे दक्षिण कोरियातील कंपनीने म्हटले आहे. आता द. कोरियातील पब्जीच्या मूळ कंपनीने भारतामध्ये उपकंपनी स्थापन करण्याचे ठरविले असून त्यासाठी 750 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतीय हितसंबंधांना कसलीही बाधा न आणता व्हिडिओ गेम, मनोरंजन इत्यादी क्षेत्रात पब्जी काम करणार असल्याचे सांगण्यात आले.
त्याकरिता पब्जी इंडिया भारतामध्ये सुरुवातीला 100 कर्मचाऱ्याची नियुक्ती करणार आहे. पब्जीचे नवे ऍप सुरक्षित असेल. त्याचबरोबर भारतीय हितसंबंधाशी कसलेही तडजोड केली जाणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. भारतातील ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन आम्ही पब्जीमधील गेम विकसित करणार आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. पब्जी गायब झाल्यानंतर भारतातील पब्जी वापरणारे ग्राहक जास्त प्रमाणात एन्कोअर गेम्स्कडे वळले आहेत. सुरुवातीला पब्जी गेम वापरणाऱ्या ग्राहकांनी दु:ख व्यक्त केले होते.
भारतात कंपनी पुन्हा काम सुरू करणार असली तरी भारत सरकारने या नव्या प्रवेशाला परवानगी दिली आहे की नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही. भारताचे द. कोरियाशी संबंध चांगले आहेत. त्यामुळे बऱ्याच कोरियन कंपन्या भारतात सक्रिय आहेत.