काय रे दिलीप? काय चाललंय हे तुझं रोजचं? घरी दमून-भागून यायचं आणि आलं की काय बघायचं. तुझा पडलेला चेहरा. अंधारात डोक्याला हात लावून बसणं आणि दारू पिणं काय झालंय तरी काय तुला? आधी तु असा नव्हतास. सध्या तर कितीतरी दिवस घरातच बसलायस ऑफिसला जातच नाहीस. काय नोकरी वगैरे सोडलीस का काय? एवढं बोलून विशाखा आत निघून गेली. पण दिलीप मात्र तसाच बसून राहिला.
घरातलं सगळं आवरल्यावर दिलीपने विशाखाला बोलावले आणि तो तिच्याशी मनमोकळं बोलला. विशाखा तुझा राग, त्रागा सगळं कळतंय गं मला. पण काय करू गेले काही दिवस मी विचित्र मनःस्थितीतून जातोय. मनावर सतत एक दडपण जाणवत राहतंय. ऑफिसला जायची तर अजिबात इच्छा होत नाहीये. कारण मला काम जमतच नाहीये असं मला वाटायला लागलंय.
घरी आलं की इतकं दमल्यासारखं होतं की काही करू नये नुसतं झोपून पडून राहावं. मनात कसली तरी भीती बसलीये. पूर्वीसारखं नीट काहीच होत नाहीये. आपल्या बाळाशीसुद्धा खेळावसं वाटत नाही गं. त्याचे हे सारे बोलणे ऐकून विशाखाने त्याला समुपदेशनासाठी न्यायचे निश्चित केले.
खरंच मित्र-मैत्रिणींनो आपण प्रत्येकच जण सतत कुठल्या कुठल्या ताणाखालून जातच असतो. सतत कसलं ना कसलं दडपण घेऊनच वावरत असतो. त्यामुळे आपली देखील कधीतरी अशी अवस्था होऊ शकते. विशाखा समजूतदार होती म्हणून ती तिच्या नवऱ्याला घेऊन समुपदेशनासाठी गेली. समुपदेशन ही आता काळाची गरज बनत चालली आहे.
सततच्या ताणतणाव आणि दगदगीत हे समुपदेशन अगदी औषधासारखं काम करतं. सध्या समाजात याबद्दल हळूहळू जनजागृती व्हायला लागली असली तरी म्हणावी अशी ती अजूनही झालेली नाही. त्यामागे अनेक कारणं लोकांच्या मनात घट्ट घर करून राहिली आहेत.
मी समुपदेशनासाठी जायचं म्हणजे सगळ्यात पहिली तर माझी इमेज डाऊन होणार. लोक मला हसणार, मला नाव ठेवणार, माझ्याविषयी इतरांचं मत खराब करणार. दुसरं म्हणजे मी समुपदेशनासाठी जायला मला काय वेड लागलंय? की माझा माझ्यावर ताबा राहिला नाहीये की मी वेडा झालोय? तिसरं म्हणजे समुपदेशकाने माझ्या मनातली, आयुष्यातली गुपितं ओळखून ती सर्वांना सांगितली तर? आणि चौथं म्हणजे माझ्या वैयक्तिक गोष्टी मी का त्यांना सांगायच्या? पण मित्र-मैत्रिणींनो हे सारे फक्त आणि फक्त गैरसमज आहेत.
तुम्हाला समुपदेशकाकडे जायचंय ते तुमचं मानसिक आरोग्य निरोगी ठेवायला. शरीर आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो तसंच मन आजारी पडल्यावर तुम्ही समुपदेशकाकडे जायचं असतं. कारण शरीर, मन दोन्ही आरोग्यपूर्ण असेल तरच आपण आनंदी होऊ शकतो.
प्रथम तुमच्या मनातला हा विचार काढा की तुम्हाला काही गंभीर मानसिक आजार आहे म्हणून तुम्ही समुपदेशककडे चालला आहात. उलटं वेळेवर उपचार घेतले नाहीत तर आता छोटा वाटणारा आजार नंतर गंभीर रूप धारण करू शकतो. ताण-तणाव, अस्वस्थता, मानसिक बेचैनी जाणवायला लागल्यावर, समस्यांची उत्तरे सोडवता येत नसतील तर लगेचच समुपदेशकाला बेटा. कोणतीही गोष्ट न लपवता त्यांना मोकळेपणाने तुमची समस्या सांगा. त्यांचे मार्गदर्शन घ्या. समुपदेशक हा तुमचा, तुमच्या मनाचा मित्र किंवा डॉक्टरच असतो.
तो तुमची समस्या सोडवायला मदतच करतो. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तुमच्या समस्येबद्दल पूर्ण गोपनियता पाळतो. तुमची समस्या सत्रांमधून लक्षात आली की त्यावरील उपाय शोधण्यास तुम्हाला मदत करतो. तुमचं मन सत्रांमधून वेगवेगळ्या उपचार पद्धतींमधून सशक्त बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमचं आयुष्य हळूहळू पुन्हा पूर्वपदावर आणण्यास तुम्हाला प्रवृत्त करतो.
त्यामुळेच मित्रांनो समुपदेशक हा तुमचा शत्रू नसून मित्रच आहे. हे आता मनावर बिंबवा पूर्वीचे गैरसमज मनातून दूर करून टाका आणि मानसिकदृष्ट्या सशक्त आणि आनंदी जीवन जगा आणि आयुष्यात प्रत्येक आघाडीवर यशस्वी व्हा.
– मानसी तांबे-चांदोरीकर