अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आज मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या अभिनय कलागुणांच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुशांतच्या जाण्याची बातमी सर्वांसाठीच धक्का देणारी ठरलीये. मात्र सुशांतसारखा आघाडीचा अभिनेता आत्महत्येला बळी पडल्याने मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यानिमित्ताने मानसिक आरोग्याचे मानसशास्त्र उलगडून सांगणारा डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी यांचा लेख दैनिक प्रभातच्या संग्रहातून
शारीरिक आरोग्याबाबत आपण नेहमीच दक्ष असतो; परंतु दक्षता आपण मानसिक आरोग्याबाबत दाखवत नाही. शारीरिक आरोग्याचे महत्त्व आपण जाणतो; पण मानसिक आरोग्याबाबत आपण अनभिज्ञ असतो, ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे, शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे.
अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढले आहे. केवळ शहरे, महानगरांमधील नागरिकांमध्येच असे आजार दिसतात असे नाही तर खेड्यामध्येही ते दिसू लागले आहेत. मानसिक विकार वाढण्याची अनेक कारणे आहेत. माणसाचे शारीरिक आरोग्य बहुतांशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे मानसशास्त्र सांगते. मन निरोगी नसेल तर शरीरही निरोगी राहू शकत नाही. आपल्या आसपासच्या लोकांचे थोडे निरीक्षण केले तर कोणत्या ना कोणत्या समस्येमुळे माणसे दुःखी झालेली आढळतात.
परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात या समस्या लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत. आल्या तरी वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे त्याकडे लक्ष देणे टाळले जाते. त्याचे भविष्यात गंभीर परिणाम दिसतात. त्यामुळे इतर शारीरिक आजार टाळायचे असतील तर त्यासाठी मनाच्या आरोग्याकडेही अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
मनोविकारावर प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध असूनही रुग्णामध्ये मानसोपचाराबाबत अनभिज्ञता आढळून येते. औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, वर्तन उपचार, संमोहन उपचार आदी उपचार पद्धती मनोरुग्णांसाठी उपलब्ध आहेत. बहुतांशी मनोविकार योग्यवेळी नियमितपणे उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात.
मात्र, उपचाराबाबतच्या अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारांवर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. त्यामुळे मनोविकार व मानसोपचाराबाबत लोकशिक्षणाची आवश्यकता आहे. प्रगत उपचारांमुळे मानसिक आजारांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्वीच्याकाळी अशा आजारांचे निदान लवकर होत नसे. तसेच मानसिक आजार असणे हा मोठा कलंक समजला जात असे. एखादा माणूस वेडा असेल तरच त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले जाते असा समज होता. त्यामुळे मानसिक ताण, नैराश्य, मनातील इतर नकारात्मक भावना अशा गोष्टींसाठी मदत घेतली जात नसे; पण आता हे चित्र बदलले आहे.
इतर आजारांप्रमाणेच मानसिक आजार हाही एक आजार आहे, असा दृष्टिकोन आता तयार होऊ लागला आहे असे असले तरी देशात मनोविकार रुग्ण आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांचे तुलनात्मक प्रमाण खूप कमी आहे.
बऱ्याचवेळा मनोविकारांमध्ये अनुवंशिकता हा घटकही महत्त्वाचा ठरतो. आई-वडिलांपैकी एखाद्यास मनोविकार असेल, तर त्यांच्या मुलांनाही मनोविकार होण्याची शक्यता असते. प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, बेकारी, अपयश, विभक्त कुटुंब पद्धती, आर्थिक असुरक्षितता अशा अनेक घटनांमुळे मनोविकार होण्याची शक्यता वाढते.
काहीवेळा व्यक्तिमत्त्व दोष मनोविकाराला कारणीभूत ठरतात. मानसिक आजारातून होणारे परिणाम टाळण्यासाठी स्व-मदतगट, सरकार अशा विविध पातळ्यांवर जागृत होणे गरजेचे आहे. त्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम व्हायला हवेत. त्याचप्रमाणे मानसिक नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्यांसाठी मदत देणारी केंद्रेही निर्माण होण्याची आवश्यकता आहे. मानसिक विकार निर्माण झाले की त्या व्यक्तीच्या वागण्यात बदल होऊ लागतात. त्याची संवादशैलीही बदलते त्याचे परिणाम नातेसंबंधांवर होतात.
अशा आजारातून त्या माणसामध्ये एखाद्या गोष्टीचे विशेषतः अंमलीपदार्थांचे, दारूचे व्यसन वाढते. मनावरील ताण कमी करण्यासाठी त्यांना व्यसन हा चांगला उपचार वाटतो. त्याचप्रमाणे मानसिक आजारामुळे त्या व्यक्तीची चिडचिड वाढते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर व्यसनांचे प्रमाण आणखी वाढेल. कौटुंबिक वादविवादांचे प्रमाणही वाढेल. नातेसंबंधातील संवाद कमी होत जाईल. पती-पत्नीने घटस्फोटाचा मार्ग अवलंबल्याने त्यांच्या मुलांच्या भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतील.
मुलांची पालकांपासून ताटातूट झाल्याने त्यांच्या आयुष्यातील प्रश्न वाढतील. मुलांमध्ये वाढणारे मानसिक आजार लक्षात घेऊन आता पालकांनाही आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुकरण करणे ही मुलांची प्रवृत्ती असते.
आपल्या पालकांबरोबर किंवा इतरत्र दारू पिणे, सिगारेट ओढणे अशी व्यसने करणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटायला लागते आणि त्याचे भविष्यात गंभीर दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी पालकांनी जबाबदार वर्तन केले पाहिजे. आपल्याकडे बालमानसोपचार तज्ज्ञांचीही कमतरता आहे. ती वाढवण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2020 पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य किंवा डिप्रेशन हा मनोविकार दुसऱ्या क्रमांकावर असेल, वाढत्या ताणतणावामुळेच नैराश्यासारखे मनोविकार आगामी काळात वाढत जाणार आहेत. पूर्वी प्रामुख्याने आर्थिक कमतरता किंवा दारिद्य्र यामुळे या विकाराला बळी पडण्याचे प्रमाण अधिक होते.
बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. डिप्रेशनसारख्या मनोविकारावर त्वरित उपचार घेणे आवश्यक असते. अन्यथा आजाराची तीव्रता वाढत जाते.