राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भारती विद्यापीठात चर्चासत्र
पुणे – नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळांमधील शिक्षकांची भरती यापुढे पारदर्शक पद्धतीने होणार आहे. मात्र, ही भरती करताना शिक्षकांची मानसशास्त्रीय चाचणी घेणे आवश्यक आहे. या चाचणीतही पात्र ठरलेल्या शिक्षकांची निवड करावी, या शिफारशीसह विविध सूचनांचा समावेश धोरणात करण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.
भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (इंग्रजी) सोमवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा आयोजित केली होती. यात भारती विद्यापीठाचे सहसचिव डॉ. के. डी. जाधव, विभागाचे प्रमुख डॉ. आर. एस. पवार, मराठी विभागाचे संचालक एम. डी. कदम, सूर्यदत्ता नॅशनल स्कुलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा, द कल्याणी स्कुलच्या प्राचार्य निर्मला वदान, विद्या प्रतिष्ठान शाळेच्या उपप्राचार्या रेश्मा गायकवाड यांच्यासह विविध सात शाळांचे प्राचार्य सहभागी झाले होते. धोरणातील विविध शिफारशींवर चर्चा केल्यानंतर उपस्थितांनी त्यामध्ये काही बदल सूचविले आहेत. याबाबत डॉ. पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले, सध्या शिक्षकांच्या भरतीमध्ये पारदर्शकता आढळून येत नाही. कंत्राटीसह विविध मार्गाने भरती केली जाते. अनेकदा गुणवत्ताही नीट तपासली जात नाही. नवीन धोरणानुसार 2022 पर्यंत त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अनेकदा कठोर शिक्षा केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे भरती करताना शिक्षकांची मानसशास्त्रीय चाचणी घेणे आवश्यक आहे.