ब-याच गोष्टींवर किशोरांचे मन:स्वास्थ्य अवलंबून असते. वेगवेगळ्या कारणांमुळे होणारा तणाव त्यांच्या मन:स्वास्थ्यांवर परिणाम करतो. पीअर प्रेशर, स्वायत्ततेची गरज, लैंगिकतेचा शोध व टेक्नॉलॉजीची भरपूर उपलब्धता व वापर हा तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरतात. मीडियामुळे किशोरांची समज व वास्तविकता यात तफावत येते.
पालकांशी जवळीक व समवयस्कांशी असलेले नाते हे मानसिक स्वास्थ्याचे महत्त्वाचे घटक आहेत. जगातील १०-२०% किशोरांना काही ना काही मानसिक समस्या आहेत. ५०% मानसिक आजार वयाच्या १४ व्या वर्षी निर्माण होतात. या सर्व व्याधी अपरिचित व अज्ञात असतात. त्यांचे निदान व उपचार वेळेवर होत नाहीत.
भावनिक असंतुलन
चिडचिडेपणा, रागावणे, फ्रस्ट्रेशन ही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. बदलत्या भावनांच्या छटा हे त्वेषाने होतात. भावनांमुळे शारीरिक समस्या जसे की पोटदुखी, डोकेदुखी ही काही किशोरांत येते. चिंतेचा आजार व उदासीनता (depression) या वयात होऊ शकते. यात मुले एकलकोंडी बनतात. मित्रांना व पालकांशी संवाद टाळतात. त्यांची शालेय प्रगती होत नाही. काही वेळेस ते आत्महत्येचाही विचार करतात.
बालपणाचे वागणुकीचे आजार
मस्ती, हॉपरअॅक्टीव व तसेच लक्ष विचलित होणे या समस्या मुलांत होतात. त्यातूनच उलट उत्तरे देणे, मोठय़ांचा अनादर, खोटे बोलणे, शाळेला न जाणे अशा वागणुकीच्या समस्या निर्माण होतात.
आहार असंतुलन
विशेषत: मुलींत जास्त दिसते. आहार न घेणे, उलटी काढणे किंवा खूप जास्त खाणे ही लक्षणे दिसतात. अन्न व फिगर यावर खूप बारीक लक्ष देतात. अपराधीपणाची भावना खूप जास्त असते.
जोखीमपूर्ण वर्तणूक
व्यसन व लैंगिक जोखीम ही या वयातील फारच गंभीर समस्या आहेत. पिअर प्रेशर व बदलते वातावरण यास ब-याच प्रमाणात कारणीभूत आहे. जगातील, १५-१९ वयोगटातील १३.६ % किशोर हे अतिअल्कोहोल सेवनाने ग्रासलेले आहेत. त्यानंतर असुरक्षित सेक्स करण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे लैंगिक आजार, किशोरीचे गरोदरपण किंवा किशोरी माता हे स्वास्थ्यांचे दुष्परिणाम होतात. जे मानसिक स्वास्थ्यास अतिधोक्याचे आहेत. २०१६ साली, १३० देशात केलेल्या एका सर्वेक्षणात आढळले की, १५-१६ वर्षाची ५.६% किशोरांनी चरस / गांजाचे सेवन केले आहे. ९ वीतील ५०% मुलांनी एक तरी व्यसन करून पाहिलेले आहे. हे फारच घातक आहे. यामुळे किशोर हे गुन्ह्याकडे वळतात, हिंसक होतात.
आत्महत्या
२०१६ मध्ये जवळ जवळ ६२ हजार किशोरांचा आत्महत्येमुळे मृत्यू झालेला आहे. १५-१९ वयोगटांत मृत्यूचे आत्महत्या हे तिसरे कारण आहे. आत्महत्या हे अतिटोकाच्या निराशेमुळे व तसेच मनातील उमाळ्याप्रमाणे वागण्यानेही होतो. आत्महत्यांची कारणे बरीच आहेत. व्यसन, नैराश्याचा आजार, शारीरिक व लैंगिक शोषण असे काही घटक त्यास कारणीभूत ठरतात. बदलत्या जगात काही online games मुळे किशोरांनी आत्महत्या केलेली आहेत. या वयात सोशल मीडियावर आत्महत्येचे संदेश देणे, चित्रफित टाकणे ही सर्वाना विचार करण्यास लावणारी चिंताजनक बाब आहे.
प्रतिबंध व उपाय
या वयात भावना व विचार यांचे प्राथमिक शिक्षण किशोरांना देणे ही आजच्या काळाची गरज आहे. व्यसनाचे ज्ञान व लैंगिक शिक्षण हे जरुरीचे आहेत. येणा-या अडचणी व आव्हान यांना सामोरे जाण्यासाठीच्या किशोरांना संवेदनक्षम बनविणे हा एक मार्ग आहे. शिक्षक व पालकांत या परिस्थितीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. त्याची माहिती त्यांना मिळाल्याने किशोरांत असणा-या समस्यांचे लवकरच निदान होणे शक्य होईल. समाजात आत्महत्या प्रतिबंधक शिक्षण होणे गरजेचे आहे. ‘
त्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठावर या बाबतीची माहिती व जनजागृती करावयास पाहिजे. व्यसनाबद्दल शाळेत मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवली पाहिजेत. तसेच लैंगिक शिक्षणाचेही धडे दिले पाहिजेत. या गोष्टी केल्यानंतर नक्कीच युवापिढीचे भावनिक सशक्तीकरण होण्यास मदत होईल.