सातारा – एके काळी राज्याची अन् देशाची धोरणे ठरवणारी कॉंग्रेस गेल्या पाच-सहा वर्षांत घायाळ झाली असून आता पक्षांतरामुळे रसातळाला गेल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसच्या कार्यकाळात सत्तेचा गोडवा चाखणाऱ्यांनी आज पक्षाकडे पाठ फिरवल्याने जिल्हा कॉंग्रेसला “बुरे दिन’ आले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोडले तर सध्या कॉंग्रेसकडे जिल्ह्यात दुसरा उमेदवार नसल्याचे वास्तव आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण हे पक्षासाठी एकाकी झुंज देत असताना या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेस उभारी घेणार का, असा प्रश्न आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. स्वातंत्र्यापासून बराच काळ सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सातारा जिल्हा कॉंग्रेसला सध्या समस्यांनी ग्रासले आहे. ज्या पक्षात उमेदवारीसाठी रांगा लागायच्या, त्याच कॉंग्रेसकडे उमेदवारी मागण्यासाठी आज कोणी नेता शिल्लक राहिलेला नाही. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्ष सोडल्यानंतर कॉंग्रेसला अद्याप जिल्हाध्यक्षही मिळालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे.
कॉंग्रेसला सर्वत्रच फुटीचे ग्रहण लागले आहे. सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व मानत असलेल्या नेत्यांच्या आपापसातील कळवंडीत पक्ष पुरता लयाला गेल्याचे चित्र आहे. जिल्हा कॉंग्रेसमध्ये माजी आमदार जयकुमार गोरे व माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्यातून विस्तव जात नव्हता. आता तर दोघेही भाजपवासी झाले आहेत. गोरे, पाटील यांच्यातील वाद तात्विक होता की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सर्वात जवळचा नेता कोण, हे दाखवण्यावरून होता, असा प्रश्न कॉंग्रेसचे कार्यकर्ते विचारत होते. जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असून यापूर्वी कॉंग्रेसचे दोन आमदार होते. त्यापैकी माण मतदारसंघातील जयकुमार गोरे हे नुकतेच भाजपच्या वळचणीला गेल्याने, कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण हे कॉंग्रेसचे एकमेव आमदार आहेत. वाई मतदारसंघात कॉंग्रेसची खिंड लढवणारे माजी आमदार मदन भोसले, कराड उत्तरमधील कॉंग्रेसचे युवा नेते धैर्यशील कदम, माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार आनंदराव पाटील, लोणंदचे आनंदराव शेळके-पाटील या शिलेदारांसह गावोगावचे सरपंच, चेअरमन सध्या भाजपमध्ये रमले आहेत.
जिल्ह्यात कराड दक्षिणचा अपवाद वगळता विजयाची खात्री देणारा एकही नेता कॉंग्रेसमध्ये उरलेला नाही. आनंदरावनानांना नेता, विधान परिषदेचा आमदार पृथ्वीराजबाबांनीच केले. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आनंदराव पाटील व त्यांच्या बगलबच्च्यांनी सत्तेचे सर्व फायदे, उपभोग घेतला. मात्र, पक्षात गळती सुरू असताना या संधिसाधूंनीच पृथ्वीराजबाबांकडे पाठ फिरवल्याने कॉंग्रेस निष्ठावंतांमध्ये संताप आहे. जयकुमार गोरेंनाही याच कॉंग्रेसने जिल्हा परिषद सदस्य, आमदार करून राज्याच्या राजकारणात ओळख दिली. मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नसतील इतक्या वेळा गोरेंच्या आग्रहाखातर माण मतदारसंघात गेले होते. असे असताना गोरेंनी नेमक्या कोणात्या कारणाने पक्ष सोडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाबा, तुम्ही गावगाड्यावर कधी बोलणार?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय राजकारण आणि विज्ञान यांचा अभ्यास वाखाण्याजोगा असल्याने त्यांचे देशात व देशाबाहेर नेहमी कौतुक होते. मात्र, स्थानिक राजकारणात संघटनेची बांधणी करताना, ग्रामीण भागात पक्षाचा प्रचार करताना अणुकरार, नव्याने लागलेले शोध, त्यांचे फायदे-तोटे, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बोलून लोकांची मने जिंकता येत नाहीत. गावकुसातील माणसांची दुखणी नेत्याला माहिती असावी लागतात. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण गावगाड्यावर कधी बोलणार, याची उत्सुकता आहे.