मुंबई: सध्या राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे या पावसात नुकसान झकलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेत शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात आहे. पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करीत आहोत, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, डॉ अनिल बोंडे, सदाभाऊ खोत, विजय शिवतारे, डॉ सुरेश खाडे, महादेव जानकर आदी उपस्थित होते.
दरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. प्राथमिक माहितीनुसार, राज्यात सुमारे 325 तालुक्यांमधील 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पीके बाधित झाली आहेत. पंचनामे काही कारणांमुळे होऊ शकले नसतील तरीही त्यांना शासकीय मदत द्या, शेतकऱ्यांनी काढलेली हानीची छायाचित्रेही पुरावा म्हणून ग्राह्य धरा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.