कोल्हापूर (प्रतिनिधी) – येत्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. कृषी कर्जमाफीत जे काही शेतकरी राहिले असतील त्यांच्या संदर्भात अभ्यास सुरू असून येत्या अधिवेशनात त्याची घोषणा होऊ शकते, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने कोल्हापुरात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हार किंवा पुष्पगुच्छ न आणता चेकच्या रूपाने पैसे देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यातुन जमा होणारा पैसा दुष्काळग्रस्त भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे.
विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग हा दुष्काळाच्या गर्तेत आहे. त्यामुळे पुष्पगुच्छद्वारे शुभेच्छा न देता आर्थिक मदत करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानुसार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या तमाम लोकांनी आज दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी निधी जमा केला जात आहे. दुष्काळाचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तो परिणाम होऊ नये म्हणून त्यांना शालेयपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत.