कोल्हापूर, दि. 10 – राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण 2185 उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र द्या, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत.
याच काळामध्ये 9 सप्टेंबर 2020 पूर्वी महाराष्ट्र राज्यात विविध विभागांच्या भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. परंतु शासनाने कोविड या एकाच कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 2,185 उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये 9 सप्टेंबर 2020 पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख आहे.
सध्या लॉकडाऊन, करोना संकट, बेरोजगारी अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवून देखील त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत.
मुख्यमंत्री या नात्याने 2185 उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण गांभीर्यपूर्ण विचार करून उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे केली आहे.