महापौरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या स्फोटामुळे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडली. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक भरपाई द्या, अशा सूचना महापौरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य विक्रांत लांडे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, उपआयुक्त सुभाष इंगळे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, देवन्ना गट्टूवार, थॉमस नरोन्हा, दिलीप धुमाळ, प्रवीण घोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिलवाल, उपअभियंता माधव सोनावणे, महावितरणचे अधिक्षक अभियंता पंकज टगलपल्लेवार, कार्यकारी अभियंता राहुल गवारे, शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय बालगुडे, अशोक जाधव, भुजंगराव बाबर, चौधरी, कवडे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, इंद्रायणीनगर येथील रोहित्र स्फोटाची घटना हृदयद्रावक होती. त्यातील मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक भरपाई देण्यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी रोहित्राच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांनी संयुक्तपणे मोहिम राबवावी. रोहित्रांना संरक्षणात्मक कवच बसवून तेथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून वारंवार तपासणी करण्यात यावी अशा सूचना महापौरांनी दिल्या.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शहराच्या दृष्टीने भविष्याचा विचार करून सर्व समावेशक विकास आराखडा तयार केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल. रोहित्र परिसरातील अतिक्रमणांवर नियमाधीन कारवाई करून गरज पडल्यास गुन्हे दाखल करावेत. भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी स्वतंत्र चेम्बरची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
महावितरणचे अधिक्षक अभियंता पंकज टगलपल्लेवार म्हणाले, शहरातील रोहित्रांच्या परिसरांचे सर्वेक्षण सुरु असून अनेक ठिकाणी रोहित्रांना संरक्षणात्मक कवच बसविण्यात येत आहेत. इंद्रायणीनगर येथील दुर्घटनेसारख्या घटना यापुढे घडू नयेत यासाठी महावितरण खबरदारी घेईल असेही ते यावेळी म्हणाले.