जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना एकत्र काम करण्याचे आवाहन
सातारा – पालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी एकत्र बसून शहरातील
प्रश्न सोडवावेत. नियोजन समितीतून लागेल ती आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांच्या दालनात घेतली. यावेळी प्रशासन अधिकारी रवी पवार तसेच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगराध्यक्षांकडून पालिकेत काम करताना येणाऱ्या अडचणी, समस्या व प्रश्न जाणून घेतले. तसेच कोणत्या योजनांची कामे सुरू असून अपूर्ण असलेल्या कामांची नेमकी कारणे जाणून घेतली. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी समन्वय राखून काम करावे. सर्वांना बरोबर घेऊन आपापल्या शहरातील प्रश्न जाणून ते सोडविण्यावर भर द्यावा. तसेच राज्य व केंद्राच्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी. शहरातील समस्या व प्रश्न तसेच नागरिकांच्या मागणीनुसार कामे करताना लागेल तेवढा निधी दिला जाईल. त्यासाठी नियोजन समितीतून आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही शेखर सिंह यांनी दिली. या बैठकीला सातारच्या नगराध्यक्षा उपस्थित नव्हत्या. त्यांच्याऐवजी पालिकेचे ाध्यक्ष किशोर शिंदे उपस्थित होते.
तीन महिन्यातून एकदा बैठक
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यापुढे तीन महिन्यांतून एकदा सर्व पालिकांच्या नगराध्यक्षांची आढावा बैठक तसेच मुख्याधिकाऱ्यांची प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालिकेतील विकास कामांना गती येणार असून शहरांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे शेखर सिंह यांच्या निर्णयाचे साताऱ्यासह इतर शहरातील नागरिकांतून अभिनंदन होत आहे.