पुणे – शहरातील लोहगाव विमानतळावरुन थेट ईशान्य व पूर्व भारतात जाणारे एकही विमान सद्यस्थितीत उड्डाण करत नाही. ईशान्य व पूर्व भागातील रांची, गुवाहाटी, भुवनेश्वरला थेट “कनेक्टिव्हिटी’ नसल्याने प्रवाशांना रेल्वेने तासन्-तास प्रवास करावा लागत आहे. यामुळे, पुण्यातून या शहरांना थेट कनेक्टिव्हिटी साधत विमान सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
ईशान्य व पूर्व भागात पुण्यातून जाण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, थेट विमानसेवा नसल्याने प्रवाशांना रेल्वेने प्रवास करावा लागत आहे, दरम्यान, ही विमानसेवा सुरू केल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. सद्यःस्थितीत पुण्यातून कोलकाता येथे चार विमाने उड्डाण करत असून गो एअर, स्पाइसजेट, इंडिगो या कंपनीची विमाने दररोज जातात. मात्र, बंगळुरू, हैदराबाद, कोची, चेन्नईला या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसारखे कोलकाता येथे जाणाऱ्या विमानांना बिझनेस क्लास वर्गातून प्रवास करणारे प्रवासीच मिळत नाहीत. परिणामी, कोलकाता येथे जाणाऱ्या विमानांची उड्डाणे वाढविण्यात आलेली नाहीत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
प्रवासी “कनेक्टिंग फ्लाइट’वर अवलंबून
पुण्यातून ईशान्य व पूर्वेकडे जाणारे थेट विमान नसल्याने “कनेक्टिंग फ्लाइट’वर प्रवाशांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे, एखाद्या प्रवाशाला गुवाहाटीला जायचे असल्यास त्याला पुणे-कोलकाता व कोलकाता-गुवाहाटी अशा दोन स्वतंत्र विमानांमधून प्रवास करावा लागतो. बहुतांश वेळा पुणे-कोलकाता विमानाला उशीर झाल्यास कोलकाता-गुवाहाटी हे कनेक्टिंग विमान प्रवाशांना पकडता येत नसल्याचे दिसून येते. पुण्यातून पूर्व, ईशान्येकडे कनेक्टिंग फ्लाइट पकडून जाणाऱ्यांची संख्या दररोज पाच हजारांच्या घरात असून थेट विमान सेवा सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.