शरद पवारांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र
मुंबई : राजकीय पक्षांच्या सभा किंवा मोठ्या नेत्यांच्या दौऱ्याच्यावेळी बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला जातो. सभा-दौरा संपेपर्यंत पोलीसांना जागच्या जागीच ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर येणारा ताण लक्षात घेऊन पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करावी, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्राद्वारे केली आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, नेत्यांचा सभा व कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागतो. बंदोबस्तावरील पोलिसांना रस्त्यावर तासनतास उभे राहावे लागते. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या या त्रासाची दखल घेतली आहे. शरद पवार यांनी याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र पाठवले आहे.
राज्यात मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दीचे नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त नेमला जातो. जाहीर सभा आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी पोलीस यंत्रणेवर ताण येत असतो. तसेच इतरवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तिष्ठत उभे असतात.
बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी तत्पर आणि सज्ज असावयास हवे. मात्र सभा सुरळीत चालू असताना विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्राण सहन करावा लागतो. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याविषयी संयोजकांना सूचना करावी व गृहविभागामार्फत मुभा असावी, अशी सूचना पवार यांनी अनिल देशमुख यांना केली आहे.