नवी दिल्ली : ज्योतिरादित्य सिंधीयांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस सरकारसमोर संकट ओढावले आहे. याचदरम्यान राज्यपालांनी 16 मार्च म्हणजेच सोमवारी कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत चाचणीस सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. कॉंग्रेसच्या 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकारसमोरील संकट कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारपासून मध्य प्रदेशचे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वीच बहुमत चाचणी केली जाणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये भाजपला आत्मविश्वास जाणवत आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोपाल भार्गव आणि डॉ. नरोत्तम मिश्र हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. विधानसभेत बहुमत चाचणी व्हावी अशी भाजपची आधीपासूनच मागणी आहे.
Madhya Pradesh Governor Lalji Tandon: Floor test in #MadhyaPradesh Assembly to be held on March 16. pic.twitter.com/OFDsnLkSt8
— ANI (@ANI) March 14, 2020
ज्या 22 आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सोपवले आहेत. ते विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले तर त्या सदस्यांची आमदारकी जाईल आणि अशात सरकारकडे 99 आमदार राहतील. सध्या विधानसभा अध्यक्षांनी 6 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. त्यामुळे सरकारकडे 115 आमदार आहेत. सर्वांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर विधानसभेत बहुमताचा आकडा 104 होईल. अशात भाजप व्हीप जारी करुन बहुमत चाचणीत बाजी मारु शकते.
जर विधानसभाध्यक्षांनी राजीनामे स्वीकारले नाहीत तर पक्षाकडून त्यांना व्हीप जारी करुन सभागृहात हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते. तरीही ते आमदार आले नाहीत तर त्यांना पक्षातून काढण्यात येईल. परंतु, सदस्यत्व कायम राहिल.
तत्पूर्वी, राज्यपाल लालजी टंडन यांनी राज्याचे मुख्य सचिव एस आर मोहंती आणि पोलिस महासंचालक विवेक जोहरी यांच्याशी चर्चा केली. त्याआधी मध्य प्रदेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन दिले होते. कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली होती.