सातारा -शेतकऱ्यांना 2019-20 च्या गळीत हंगामाचे उस बिल मिळावे व वीज वितरणने आकारलेल्या वीज बिलांमधून माफी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली.
या मागण्याचा शासनाने गांभीर्याने विचार न झाल्यास दि. 17 ऑगस्टपासून किसन वीर कारखान्याच्या अध्यक्षांच्या सदरबझार येथील निवासस्थानासमोर निदर्शने करून व्यापक आंदोलनाची सुरवात होईल, असा इशाराही देण्यात आला.
संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, संजय महामुलकर, दादासाहेब यादव आदी सदस्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन सादर केले.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंर्तगत कर्जदारास 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्यावे, सातारा जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे नुकसानीचे मंडलनिहाय सर्वेक्षण करून त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, 2019-20 च्या गळीत हंगामाची बिले तत्काळ मिळावी व एफआरपी कायद्याचा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
या मागण्याचा शासनाने गांभीर्याने विचार न झाल्यास दि. 17 ऑगस्टपासून किसन वीर कारखान्याच्या अध्यक्षांच्या सदरबझार येथील निवासस्थानासमोर निदर्शने करून व्यापक आंदोलनाची सुरवात होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. रमेश पिसाळ, नितीन यादव, बापू साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, विजय चव्हाण, महादेव डोके, दत्ता पाटील या आंदोलनात सहभागी झाले होते.