मुंबई : काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात मुंबई आज आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. काँग्रेस कार्यालय टिळक भवनाबाहेर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हे कोणत्याही किंमतीत सहन केले जाणार नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली,काँग्रेसचे प्रमुख नेते यांनी आज मुंबई येथील टिळक भवन परिसर, इंडियाबुल्स समोर येथे आंदोलन केले. या आंदोलनाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार व प्रमुख नेते उपस्थित होते.
दादर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार, यांसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले.