नवी दिल्ली – कोट्यवधी रुपयांच्या बॅंक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने कोलकात्यातील एका उद्योग समुहाची तब्बल 483 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. “ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तयाल ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकीच्या या मालमत्तेला सध्या आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याखाली प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तयाल समुहाने बॅंक ऑफ इंडिया आणि आंध्र बॅंकेकडून 2008 मध्ये 524 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र बनावटगिरी अणि बेकायदेशीर कंपन्यांचा वापर करून हे कर्ज बुडवण्यात आले. त्यामुळे “ईडी’ने ही कारवाई केली आहे. “पीएमएलए’ कायद्याखाली तयाल समुहाच्या विरोधात झालेली ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी युको बॅंकेच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणीही तयाल समुहाचा तपास सुरू आहे. त्या प्रकरणी या समुहाची 234 कोटी रुपयांची मालमत्ता 2016 मध्ये जप्त करण्यात आली आहे. युको बॅंकेच्या प्रकरणी समुहावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.