कर्जत/ जामखेड – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करा, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही भरले जातील आणि आवर्तनाचा कालावधी वाढविण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून पत्र दिले आहे.
कर्जत-जामखेड हा अवर्षणग्रस्त भाग आहे. उन्हाळ्यात या भागातील भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावते. त्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी कुकडी आणि सीना या कालव्यांचा मोठा आधार आहे. परंतु, सद्यस्थितीत योग्य नियोजनाअभावी सर्व गावांना पाणी मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भोसे खिंडीतून सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती.
जेणेकरून सीना कालव्याचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडता आले असते आणि कालव्याच्या शेवटच्या गावांनाही पूर्ण दाबाने सिंचनासाठी पाणी मिळाले असते. परंतु ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सध्या सीना कालव्यातून आवर्तन सोडलेले असतानाही ते पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे निमगाव डाकू, नवसारवाडी, पाटेवाडी, आनंदवाडी, तरडगाव ही अखेरची पाच-सहा गावे या आवर्तनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
कुकडी कालव्याच्या 165 कि.मी.ला जो दाब 600 ते 650 क्यूसेक्स पाहिजे तो अजूनही 400 क्यूसेक्सच्या पुढे गेलेला नसल्याने कुकडी लाभक्षेत्रातील टेलच्या भागात आजपासून सिंचनासाठी सुरवात व्हायला पाहिजे होती, ती अजूनही झाली नाही. यामुळे शेतातील उभे पीक आणि फळबागा डोळ्यासमोर सुकत असल्याचे पाहून त्या वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यावाचून लोकांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील 22 ते 23 गावंमध्ये टॅंकरची सोय केली आहे.
सध्या लोकांना आणि जनावरांनाही पिण्याचे पाणी, चारा पिके तसेच फळबागा यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे या आवर्तनाचे योग्य नियोजन केले नाही तर अनेक गावे वंचित राहू शकतात. परिणामी कुकडी आणि सीना कालव्यावरील गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्रावरील चारा पिके आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.