शिवसेना शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोणी काळभोर-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करुन तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात बोलताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावामधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी शासकीय मदतीकडे आस लावून बसले आहेत. या गंभीर परिस्थितीमध्ये गरजू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शेतीचे पंचनामे तातडीने करणे गरजेचे आहे.
यावेळी माजी आमदार सुरेश गोरे, शरद सोनवणे, जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, शिरुर तालुका प्रमुख सुधीर फराटे, अशोक खांडेभराड, जिल्हा संघटक रमेश भोसले, उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, लक्ष्मण जाधव, कुंडलिक पवार आदी उपस्थित होते.