विधानसभा निवडणूक : “हिशोब’ न दिल्यास होणार कारवाई
पिंपरी – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणाऱ्या सर्वच उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून ते मतदान होईपर्यंत प्रचारादरम्यान केलेला खर्चाचा लेखा-जोखा 19 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे. उमेदवारांनी हा अंतिम खर्च सादर न केल्यास निवडणूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक आठवड्याचा काळ उलटून गेला आहे. तरीही अद्याप निवडणूक विभागाचे कामकाज सुरुच आहे. काही दिवसांपासून निवडणुकीची इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना पूर्ण खर्च सादर केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक लढविणाऱ्या सर्वच उमेदवारांना त्यांनी प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाचे सादरीकरण दररोज करावे लागत होते. या दरम्यान काही उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी आपला प्रचाराचा खर्च सादर केला होता. आता निवडणूक पार पडल्यानंतर प्रचारादरम्यान उमेदवारांनी केलेला सर्व खर्च निवडणूक विभागाकडे सादर करावयाचा आहे. त्यानुसार 19 नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांनी प्रचारादरम्यान केलेल्या खर्चाचे सादरीकरण निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष करावे लागणार आहे.
26 व्या दिवशी पुनर्मेळ बैठक बंधनकारक
निवडणुकीच्या खर्च अनुदेशामधील तरतुदीनुसार विधानसभा निवडणूक 2019 लढवणाऱ्या उमेदवारांची लेखा पुनर्मेळ बैठक (एआरसी) निकाल जाहीर झाल्यापासून 26 व्या दिवशी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार ही बैठक 19 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक विभागाने शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची लेखा पुनर्मेळ बैठक (एआरसी) दि. 19 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. या बैठकीत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीकडून खर्चाची पडताळणी करण्यात येणार आहे.