मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीनही लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणारे निम्म्याहून अधिक उमेदवार हे अल्पशिक्षित आहेत. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 थी ते 10वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 24 आहे, तर उच्चशिक्षित 11 उमेदवार आहेत.
रेल्वे आणि रस्ते या संदर्भातील विविध समस्यांवर मुद्दे मांडून लोकसभेसाठी निवडणूक लढवणारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीनही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मते मिळवण्यासाठी उच्चशिक्षित आणि अल्पशिक्षित मुद्दयाचाही प्रचारतंत्रात उपयोग करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आपल्या प्रचारफेऱ्यांमध्ये हे उमेदवार शिक्षणाचा मुद्दा ठासून मांडत आहेत. उमेदवारांच्या फेसबुक तसेच अन्य डिजिटल खात्यांवरदेखील अशाच प्रकारे उमेदवारांच्या छायाचित्राच्या खालील बाजूस त्यांच्या पदव्यांचे विश्लेषण करून, अशी छायाचित्रे प्रसारित होत असल्याचे दिसून आले आहे.