बेलभंडारा उधळून अभिनेता देवदत्त नागे यांचे आवाहन
राजगुरूनगर – येऊन येऊन येणार कोण अतुल देशमुख शिवाय आहेच कोण…”येळकोट येळकोट जय मल्हार’….. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या या शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठविण्याचे वचन द्या, असे बेलभंडारा उधळत अभिनेता देवदत्त नागे यांनी आवाहन केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ राजगुरूनगर येथे बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (दि. 18) अभिनेता नागे बोलत होते.
यावेळी अपक्ष उमेदवार अतुल देशमुख, गटनेते शरद बुट्टे पाटील, कॉंग्रेसचे नेते अमोल पवार,भाजपचे पांडुरंग ठाकूर, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, कैलास गाळण, चांगदेव शिवेकर, संदीप सोमवंशी, क्रांती सोमवंशी, अजय चव्हाण, शिवाजी डावरे, अश्विन भंडलकर,भाऊ फुरसुंगीकर, इसाक शेख यांच्यासह तालुक्यातील भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी, आळंदी राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगरसेवक यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता
अतुल देशमुख म्हणाले की, तालुक्यात पुनर्वसन प्रश्न प्रलंबित आहेत. चास कमान धरणाच्या डावा कालव्याच्या अस्तरीकरणचे प्रश्न प्रलंबित आहे.
हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक करायला वेळ नाही. एमआयडीसीच्या दारात नोकऱ्या मिळत नाहीत. यासाठी आमदार भूमिका घेत नाही. आम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहे. न बोलणाऱ्या माणसापासून तालुक्याची सुटका करायची आहे. तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मी अपक्ष उभा आहे. आम्ही यावेळी क्रांती करणार आहोत.
तुमची साथ असुद्या, कपबशी चिन्हापुढील बटन दाबा. आपुलकीचे नाते दृढ करा, असे आवाहन त्यांनी केले. शरद बुट्टे पाटील म्हणाले, या सभेला प्रचंड रेकॉर्डब्रेक गर्दी जमली हाच अतुल देशमुख यांचा विजय असल्याचे त्यांनी नमूद करीत आजी-माजी आमदारांवर सडकून टीका केली.
खेड तालुक्याच्या विकासाठी शरद बुट्टे पाटील, अमोल पवार, दिलीप मेदगे आणि कैलास गाळव हे जनतेचे प्रतिनिधी आमच्यात ठरलंय आजी-माजी आमदारांना तालुक्यातून हद्दपार करायचे. तालुक्याचे नेतृत्व करणारा आमदार तालुक्यात राहत नाही. तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर विधान सभेत आवाज उठवत नाही. खेड तालुक्याच्या प्रगतीत कोणते भरीव काम गोरे यांनी केले. उलट आमच्या कामांचे क्रेडिट घेत असतात.
-अतुल देशमुख, अपक्ष उमेदवार, खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघ.