सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात औषधांच्या दुकानांमध्ये रात्री 8 नंतर खाद्यपदार्थ विक्रीस मनाई करणारा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केला आहे. करोनाचे संकट वाढत असल्याने जिल्ह्यात रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 या वेळेत संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू आहे.
त्यामुळे औषध दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात येत आहेत; परंतु रात्री 8 वाजल्यानंर औषध दुकानांमध्ये आईस्क्रीम, चॉकलेट, स्नॅक्स आदी खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे निर्दशनास आले आहे.
त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये औषध दुकानांमध्ये रात्री 8 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता खाद्यपदार्थ विकण्यास मनाई केली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 ते 60, भादंवि कलम 188 आणि भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.