मुंबई – महाराष्ट्र सरकार पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी देशभरात ओळखले जाते. पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसत आहे. केंद्राने लॉकडाउन उठवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देश ठाकरे सरकार मान्य करायला तयार नाही.
ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिर आणि आर्थिक केंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, परंतु महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीने कोणतेही पावले उचलताना दिसत नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वटिद्वारे ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे.
करोना लॉकडाउन उठवताना केंद्राने अनेक दिशानिर्देश दिले, परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे ऍप आले, त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. करोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजुनही लॉकडाउन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.
तसेच, इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतो आहे. इतर राज्यांनी मंदिर उघडली. तिथला व्यवसाय व भक्तांसह दोघांचीही सांगड घातली. परंतु अजुनही महाराष्ट्र शासन मंदिर उघडायला तयार नाही. दुसऱ्या बाजूस इतर राज्यांनी आर्थिक घडामोडी सुरू केल्या आहेत.
परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावले उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेले आहे, असे एकंदरीत दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व व निर्णय घेणारे राज्य असे पुन्हा उभे करावे, ही विनंती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.