प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यापूर्वी मला वृक्षारोपणाच्या विश्वविक्रमावेळी बोलावलं. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. आज तिरंगा ध्वजासह फोटो अपलोड करण्याच्या विश्वविक्रमी कार्यक्रमाला मला बोलावलं. आज मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो आहे, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “यापुढे मात्र विश्वविक्रमाच्या कार्यक्रमाला मी येणार नाही,’ अशी टिपण्णी केली. हाच धागा घेऊन त्यांनी शेवटी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला कोणत्याही पदावर असलो तरी “मी पुन्हा येईन’ असे खुमासदार स्पष्टीकरण दिल्याने सभागृहात हास्याची लकेर उमटली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव’ व “हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित युवा संकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, शिवेंद्रराजे भोसले, सुनील कांबळे, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. राजेश पांडे, तसेच प्रसेनजीत फडणवीस, संजय चाकणे, प्रभाकर देसाई आणि संतोष परचुरे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, देशाविषयी अभिमानाची भावना आणि देशभक्तांच्या त्यागाविषयीची तरुणांमध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. कुलगुरू डॉ. काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेश पांडे यांनी केले. युवा संकल्प अभियान स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांना अभिवादन करण्यासाठी आहे. किमान 5 लाखांहून अधिक व्यक्तींनी तिरंगा ध्वज हातात घेतलेला स्वतःच्या छायाचित्रांचा ऑनलाइन अल्बम करून विश्वविक्रम करण्याचा निर्धार पांडे यांनी यावेळी व्यक्त केला.
आजच्या पिढीची जगावर छाप
आज देशाला विश्वगुरू पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता असलेली पिढी देशाला पुढे नेत आहे. संशोधन, नाविन्यता आणि उद्यमशीलतेच्या बळावर या पिढीने जगाला चकित केले आहे. जागतिक स्तरावर देशाला विकासाकडे घेऊन जाताना त्यांची नाळ राष्ट्राशी जोडण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे देंवेंद्र फडणवीस म्हणाले.