मुंबई – सध्या निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे सावध गुंतवणूकदारांनी ज्या कंपन्यांचे शेअर वाढले होते त्या शेअरची विक्री करून नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेअर निर्देशांकांत घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 421 अंकांनी म्हणजे 1.10 टक्क्यांनी कमी होऊन 38,071 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 97 अंकांनी कमी होऊन 11,202 अंकांवर बंद झाला.
आजच्या नफेखोरचा सर्वांत जास्त फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला होऊन या कंपनीचे शेअर 3.75 टक्क्यांनी कमी झाले. मारुती सुझुकी कंपनीला प्रथमच तोटा झाला आहे. त्यामुळेही शेअरबाजारात नकारात्मक वातावरण होते. लवकरच फेडरल रिझर्व्ह पतधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे जागतिक शेअरबाजारात वातावरण आहे.
आज झालेल्या विक्रीचा फटका ऊर्जा, वाहन, तेल आणि नैसर्गिक वायू, माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू क्षेत्रांना होऊन या क्षेत्रांचे निर्देशांक 4 टक्क्यापर्यंत कमी झाले. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध होणे साहजिक आहे. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याबद्दल गुंतवणूकदारांना चिंता वाटत असल्याचे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.