वॉशिंग्टन – भारतासह जगातील अनेक देशांच्या नागरिकांच्या दैनंदिन भोजनाचा भाग असलेला तांदूळ दोन हजार पन्नास पर्यंत भोजनाच्या थाळीतुन गायब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बदलते हवामान, पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग या कारणामुळे येत्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये तांदूळ गायब होण्याचा धोका आहे. इलिओनिस विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. या संशोधकांनी भारतातही संशोधन केले आहे.
भारत हा तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक आणि वापरकर्ताही आहे. या पार्श्वभूमीवर हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे. 2050 या वर्षापर्यंत तांदळाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होण्याचा धोका या संशोधकांनी आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. शेत जमिनीतील वरील भागातील मातीच्या संवर्धनासाठी जर नजिकच्या काळामध्ये काही केले गेले नाही तर या शेत जमिनीमध्ये तांदूळ उगवून येणे अवघड होणार आहे.
या संशोधकांनी बिहारमधील नॉर्मन बोरलॉग शेती विषयक संशोधन करणाऱ्या संस्थेबरोबर सहकार्य करून हे संशोधन पूर्ण केले आहे. या संशोधकांच्या टीमचे प्रमुख आणि इलिओनीस विद्यापीठातील कृषी आणि जैविक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक प्रशांत कलीता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शेत जमिनीचा कमी होणारा कस, पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग त्याचा मोठा परिणाम तांदुळाच्या उत्पादनावर होणार आहे.
या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक किलो तांदूळ पिकवून तो शिजवण्यासाठी किमान चार हजार लिटर पाणी लागते. आगामी कालावधीमध्ये एवढे पाणी उपलब्ध होणे अशक्य असल्यानेच तांदूळाच्या उत्पादनावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे.
तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तांदळाचे पीक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जर सकारात्मक बदल केले नाहीत आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारले नाही तर 2050 पर्यंत लोकांना रोजच्या भोजनात भात खायला मिळणार नाही.