नवी दिल्ली –सध्या स्मार्टफोन बाजारामध्ये चिनी फोनचा बोलबाला आहे. मात्र, लावा ही एकमेव कंपनी पूर्णत: भारतीय बनावटीचे स्मार्टफोन बनवते असे दावा या कंपनीने केला आहे. कंपनी मेड इन इंडियाचे स्मार्टफोनचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
लावाच्या उत्पादन विभागाचे प्रमुख तेजिंदर सिंह म्हणाले की, फक्त लावा संशोधनापासून उत्पादनापर्यंत पूर्णतः देशांतर्गत उत्पादन करते. आम्ही नवा फोन बाजारपेठेत सादर करण्यासाठी डिझाईन स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. यासाठी पहिले बक्षीस 50 हजार दुसरे बक्षीस 25 हजार आणि तिसरे बक्षीस 15 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
सरकारने भारतातील मोबाइल कंपन्यांना देशातच मोबाइल फोन तयार करण्याचा आग्रह केला आहे. लावाबरोबरच मायक्रो मॅक्स ही कंपनी नवीन उत्पादने सादर करणार आहे. कंपन्यांनी सांगितले आहे की, आम्हाला इतर देशातील मोबाइल कंपन्यांप्रमाणे भांडवल आणि इतर सवलती उपलब्ध केल्या तर आम्ही भारताला पुरतील एवढे मोबाइल फोन तयार करू. त्याचबरोबर निर्यातही करू शकणार आहोत.