सर्जिकल स्ट्राईकवरील “उरी’ला मस्त प्रतिसाद मिळाला. तर आयुष्मान खुरानाच्या “आर्टिकल 15’लाही प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता नाट्यमय घडमोडींवर चित्रपट निर्मात्यांचा डोळा असणारच. त्यातही मोदी सरकारचे आतापर्यंतचे मोठे यश असलेल्या 370 कलमाबाबतच्या निर्णयाला निर्माते दुर्लक्षिल तरी कसे? काश्मीरसाठीच 370 कलम रद्द करण्याचा निर्णय संसदेमध्ये घेतला गेला आणि या विषयावर सिनेमा काढण्यासाठी बॉलिवूड निर्मात्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. सगळ्यांच्या आगोदर या सिनेमाच्या शिर्षकाची नोंदणी करण्यसाठी निर्मात्यांनी दिल्लीत यायला सुरुवातही केली आहे.
“आर्टिकल 370′, “कलम 35 ए’ आणि “काश्मिर में तिरंगा’ यासारख्या शिर्षकांची नोंदणी करण्यासाठी निर्मात्यांची घाई सुरू केली आहे. 370 कलमाशी संबंधित सर्व संभाव्य शिर्षके निर्मात्यांनी राखून ठेवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या विषयाशी संबंधित 50 टायटल्स नोंदवली गेली आहेत. “आर्टिकल 15′ ला खूप यश मिळाले आहे, त्यामुळे त्याच्याशी साधर्म्य असलेले टायटल आपल्यालाच मिळावे, याचा निर्मात्यांकडून प्रयत्न सुरू आहे.
अन्य पसंतीच्या टायटल्सपैकी काश्मीर में तिरंगा, काश्मीर हमारा है, धारा 370 आणि धारा 35 ए सारखी टायटल्स देखील बुक झाली आहेत. अनेक निर्मात्यांनी आपण दिलेल्या प्रस्तावापैकी शिर्षकाची परवानगी लवकर मिळावी म्हणून जॅक लावण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच या विषयी संशोधन, कलाकारांची निवड, कथा आणि पटकथेचे लेखन अशी बरीच कामे करायला घेतली असल्याचेही समजते आहे.