पिंपरी – शहरातील 73 हजार शिधापत्रिकांना आधार कार्डाचे लिंकिंग पूर्ण झाले आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा अशा दोन योजनांमध्ये ही कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती निगडी शिधापत्रिका कार्यालयाचे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी दिली.
शिधापत्रिका कार्यालयातंर्गत येणाऱ्या चिंचवड विभागातंर्गत 37 हजार 500 तर, पिंपरी विभागातंर्गत 35 हजार 996 एवढे आधार कार्डलिंकिंग करण्यात आले आहे. शिधापत्रिका कार्यालयाकडून केसरी आणि शुभ्र कार्ड देण्यात येतात. शासनाकडून अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेत सध्या गहू 2 रुपये किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने देण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशनिंग व्यवस्थेतील कारभार अधिक पारदर्शक होणार आहे, असा दावा केला जात आहे. आता शिधापत्रिकेतील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा, शिधापत्रिकेतून नावे वगळल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिका धारकाची असणार आहे.
रेशनिंग व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत सरकारकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्यासाठी 2015 साली सरकारने रेशनिंग व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. या माध्यमातून पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, निश्चित वेळेत आणि पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा आधार घेण्यात आला.
त्यानुसार, ई-केवायसी करण्यासह बायोमेट्रिक आणि पोर्टेबिलिटी पद्धतीचा अवलंब सुरू झाला. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होऊ लागले. शिधावाटप अधिकाऱ्यांद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनामुळे शिधापत्रिका धारकांनी आपले आधार कार्ड, आपली जुनी शिधावाटपपत्रिका, बॅंकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्जदेखील
भरून दिले.
शिधापत्रिकेद्वारे जे कुटुंब धान्य घेते त्यांना सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. संबंधितांकडून आवश्यक अर्ज व अन्य कागदपत्रे घेऊन कार्यवाही केली जात आहे.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी शिधापत्रिका कार्यालय