जनसमस्यांसाठी जनसंवाद क्षेत्रीय कार्यालर्यांमध्ये चर्चा
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आल्यापासून दर सोमवारी सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा घेतल्या जात आहेत. या सभांमध्ये नागरिक आपल्या समस्या मांडत आहेत तर काहीजण समाधानही व्यक्त करत आहेत. तिसऱ्या जनसंवाद सभेत ठिकठिकाणी वेगवेगेळ् प्रकार पहावयास मिळाले. काही ठिकाणी आंदोलने, निषेध तर वेगवेगळ्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.
पिंपरी – नागरिकांच्या समस्या सोडविताना नगरसेवक राजकारण करतात. प्रशासकाच्या काळात समस्या मार्गी लागतात. त्यामुळे नगरसेवक नकोच, अशी भूमिका सोमवारी (दि. 4) जनसंवाद सभेसाठी ब क्षेत्रीय कार्यालयात आलेल्या काही नागरिकांनी मांडली.
प्रशासकाची नियुक्ती केल्यापासून तिसरी जनसंवाद सभा सोमवारी ब क्षेत्रीय कार्यालयात पार पडली. यावेळी समन्वयक मकरंद निकम रजेवर गेल्याने क्षेत्रीय अधिकारी अभिजीत हराळे यांनी काम पाहिले.
प्रत्येक नागरिकाला नंबरप्रमाणे केबिनमध्ये बोलावून त्याची तक्रार ऐकून घेत त्यावर उपाययोजना करण्याची सूचना देण्यात येत होती. एकूण 19 तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. जनसंवाद सभा केबिनमध्ये नको, सभागृहातच घ्यावी, अशी मागणी काही जणांनी केली. त्यासाठी सभागृहात जमिनीवरच बसकन मांडली. तसेच गोंधळही घालण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी एकदम केबिनमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडल्यावर गोंधळ घालणाऱ्यांनी माघार घेतली. गेल्या जनसंवाद सभेतही यातील काही जणांनी गोंधळ घातला होता.
कुत्र्यांना बिस्किटे द्या
प्रेमलोक पार्क परिसरात भटक्या कुत्र्याची मोठी समस्या असल्याची तक्रार एका नागरिकांनी मांडली. यापूर्वीही आपण याबाबत पशू वैद्यकीय विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यावेळी पशू वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी मागे लागणाऱ्या कुत्र्यांना बिस्किटे द्या, असा अजब सल्ला दिल्याचे सांगितले. तसेच आपल्या परिसरात भोसरीहून कुत्री आणून सोडल्याचा दावा या तक्रारदाराने केला.
घरात शिरल्या फांद्या, सरडे
वारंवार तक्रार करूनही उद्यान विभागातील कर्मचारी कार्यवाही करीत नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरील झाडांच्या फांद्या नागरिकांच्या घरात येत असल्याचे एका तक्रारदाराने सांगितले. तर दुसऱ्या तक्रारदाराने झाडाच्या फांद्यावरून सरडे घरात येत असल्याचे सांगितले. तसेच गेल्या दोन जनसंवाद सभेत मांडलेल्या तक्रारींची दखल घेतली नाही, अशी कैफियत काही नागरिकांनी मांडली.
महिलांचा पाण्यासाठी मोर्चा
गेल्या काही दिवसांपासून दळवीनगर भागात अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी महिलांनी मोर्चा आणला होता. आमच्या घरात पाणी नाही. आत्ता टॅंकरने पाणी पुरवठा करा, तसेच पिण्यासाठी दररोज योग्य दाबाने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.