उरुळी कांचन -उरुळी कांचन ते खामगाव टेकपर्यंत रस्ता खराब झाला असून हा रस्ता अपघाताला निमत्रंण देणारा ठरत आहे. हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा; अन्यथा उरुळी कांचन, टिळेकरवाडी, खामगाव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुनील तांबे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.
उरुळी कांचन येथून तांबेवस्ती टिळेकरवाडीसह रस्ता खामगाव गावाकडे जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक होत असते.
खामगाव, टिळेकरवाडी, भवरापूरसह भागातील दोन हजार विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालयात या रस्त्याने येतात. हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. विद्यालयातील मुलींना जीव मुठीत धरून सायकलने शाळेत शिक्षणासाठी यावे लागते. रस्ता खराब असल्याने अनेक मुली शिक्षण सोडून घरी राहू लागल्या आहेत. रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
तीन ते चार दिवसांत रस्त्याचे काम सुरू होईल. पावसामुळे रस्ता खराब झाला आहे. याची जाणीव आहे. परंतु येत्या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू होईल.
-बाबुराव पाचर्णे, आमदार.