जयपुर – वाराणसी मतदार संघातून मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी या उभे राहण्याची शक्यता होती पण ती मावळल्याने त्या विषयीची चर्चा अजून सुरू आहे. गांधी परिवाराचे निकटवर्ती समजले जाणारे सॅम पित्रोदा यांनी या विषयी पत्रकारांशी बोलताना सांगितले की वाराणसीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय स्वता प्रियांका गांधी यांनीच घेतला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी या विषयीचा निर्णय त्यांच्यावरच सोपवला होता. त्यांच्यावर सध्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. केवळ एका मतदार संघात अडकून पडण्यापेक्षा पक्षासाठी अन्य अनेक मतदार संघात प्रचार करणे अधिक लाभदायक आहे याचा विचार करून त्यांनी वाराणसीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे आणि तो त्यांनी पक्षाला कळवला आहे असेही पित्रोदा यांनी सांगितले.