आग्रा, लखनौ – आग्रा येथे पोलिसांच्या कोठडीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बुधवारी रात्री भेट घेतली. तत्पूर्वी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आग्रा येथे जाण्यापासून रोखले होते. मात्र, नंतर पोलिसांनी प्रियंका यांना जाऊ दिले होते. त्यानंतर संध्याकाळी प्रियंका गांधी आग्र्याला रवाना झाल्या, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी सांगितले.
लखनौ पोलिसांनी एकूण चारच जणांना आग्रा येथे जाण्याची परवानगी दिली. उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि वरिष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांना प्रियंका यांच्या समवेत जाण्याची परवानगी देण्यात आली.
प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले गेले नव्हते किंवा त्यांना अटकही केली गेलेली नव्हती. मात्र, प्रचंड गर्दी झाल्यामुळे वाहतूक संथ झाली होती. त्यामुळे प्रियंका यांना पक्षाच्या कार्यालयात किंवा घरी जाण्याची सूचना केली गेली होती. मात्र, त्यांनी न ऐकल्यावर त्यांना पोलीस लाईन्समध्ये पाठवण्यात आले होते, असे स्पष्टीकरण लखनौचे पोलीस आयुक्त डी.के. ठाकूर यांनी दिले.
आग्रा येथील पोलीस ठाण्यातून 25 लाख रुपये चोरल्याचा आरोप असलेल्या अरुण याचा कोठडीतच मृत्यू झाला होता. चौकशीदरम्यान प्रकृती खालावल्यामुळे अरुण याचा मृत्यू झाला होता. प्रियंका गांधी यांनी अरुण याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. “आप’चे नेते आणि राज्यसभेचे नेते संजय सिंह यांनीही अरुण याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था खालावत असल्याची टीका त्यांनी केली.