नवी दिल्ली – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या हाती नामुष्कीजनक पराभव आला. त्या पिछेहाटीची संपूर्ण जबाबदारी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी स्वीकारली.
उत्तरप्रदेश निवडणुकीत कॉंग्रेसची सर्व धुरा प्रियंका यांनी सांभाळली. नवी रणनीती आखून पक्ष त्या निवडणुकीला सामोरा गेला. यावेळी कामगिरी सुधारण्याची आशा पक्ष बाळगून होता. मात्र, मागील वेळेपेक्षाही पक्षाची कामगिरी यावेळी सुमार ठरली.
उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या एकूण 403 पैकी केवळ 2 जागा कॉंग्रेसला मिळाल्या. पक्षाच्या मतांचे प्रमाण घटून अवघे 2.33 टक्के इतके झाले. त्या निकालाचा आढावा बुधवारी येथील बैठकीत घेण्यात आला. प्रियंका यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला पक्षाचे उत्तरप्रदेशातील प्रमुख नेते उपस्थित राहिले.
कॉंग्रेस पक्ष नेमका कुठे आणि का कमी पडला याची मीमांसा बैठकीत करण्यात आली. उत्तरप्रदेशातील पक्षाची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी पाऊले उचलण्याचे ठरले. त्यामुळे वेळ न दवडता प्रियंका आणि उत्तरप्रदेश कॉंग्रेस पुढील लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणार असल्याचे संकेत मिळाले.