नवी दिल्ली – कानपुरातील एका गरीब घरातील मुलाचे काही जणांनी अपहरण केले. त्याच्या कुटुंबीयांकडे 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. संबंधित कुटुंबाने आपले राहते घर अणि
दागदागिने विकून पैसे जमवून ते अपहरणकर्त्यांच्या हातात दिले पण अजून ना अपहरणकर्ते सापडले ना त्या मुलाची सुटका झाली.
ज्या कानपूरमध्ये काही दिवसांपूर्वी जी मोठी घटना घडली होती तेथेच पुन्हा हा गंभीर मामला समोर आला असून उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्यच उरले नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टवरून त्यांनी ही टीका केली आहे. त्यानंतर ट्विटर पोस्टवर त्यांनी उत्तर प्रदेशातील करोना स्थिती हाताळण्यात योगी सरकारला आलेल्या अपयशावरूनही टीकास्त्र सोडले आहे. करोनाग्रस्तांची येथे कशी परवड होत आहे आणि करोनाच्या चाचण्यांचे रिपोर्ट कसे
चुकीचे येत आहेत त्याचे दाखलेही त्यांनी येथे दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्याच गोरखपूर मतदारसंघात एका मृत व्यक्तीची चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल देण्यात आला होता. या इसमाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर त्याला करोना झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा मृतदेह घरातून नेण्यासाठी सोळा तास शववाहिनीची वाट पाहावी लागली. अशा पद्धतीने योगी सरकार राज्यातील करोनाचा मुकाबला करीत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.