नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत त्या पक्षाला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी लक्ष्य केले. कॉंग्रेसचे महत्व कमी झाल्याचे प्रियंका यांनी मान्य केल्याची टिप्पणी त्यांनी केली.
उत्तरप्रदेशात सप-बसप महाआघाडीवर कॉंग्रेसचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. एकतर आमचे उमेदवार निवडून यावेत किंवा त्यांनी भाजपची मते खेचावीत, अशा पद्धतीने आम्ही उमेदवार निवडल्याचे प्रियंका बुधवारी अमेठीत बोलताना म्हणाल्या. त्याचा संदर्भ देत जेटली यांनी कॉंग्रेसची खिल्ली उडवली. एकेकाळी मुख्य प्रवाहातील पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे रूपांतर आता कमी महत्वाच्या संघटनेत झाल्याची कबुली प्रियंका यांनी दिली आहे. पं.जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात कॉंग्रेसच्या लोकसभेत 300 ते 400 जागा असायच्या. राजीव गांधींच्या काळात 125 ते 150 जागांचा तो पक्ष बनला. आता केवळ 40 ते 70 जागांचे प्रतिनिधित्व करणारा तो पक्ष बनला आहे, असे जेटली म्हणाले.