नवी दिल्ली – देशात आता काही मार्गांवर खासगी रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत. या रेल्वे गाड्यांच्या मालकांना त्यांच्या निर्णयानुसार रेल्वेचे भाडे आकारता येणार आहे त्याबाबत त्यांच्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, भाडे ठरवण्याचे त्यांना स्वातंत्र्य असेल पण त्या मार्गावर चालणारी विमाने आणि वातानुकुलीत बससेवा यांच्या दरांचा विचार करूनच त्यांना भाडे आकारणी करावी लागेल असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
मोदी सरकारने देशातील रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार रेल्वे स्थानक उभारणीपासून ते रेल्वे सेवा सुरू करण्यापर्यंतच्या सर्वच कामांचे आता टप्प्याटप्प्याने खासगीकरण केले जाणार आहे. त्यातून रेल्वे सेवेत सुधारणा होईल अशी सरकारला अपेक्षा आहे.
सध्या रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे तशातच केंद्र सरकार पुढेही मोठे आर्थिक आव्हान आहे त्यामुळे रेल्वेत गुंतवणूक करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे खासगी गुंतवणूकदारांमार्फत हे नेटवर्क अधिक आकर्षक पद्धतीने चालवता येईल असा सरकारचा दावा आहे.
भारतात रेल्वेचे भाडे हा एक राजकीय महत्त्वाचा विषय असतो, लाखो प्रवाशांसाठी ती एक संवेदनशील बाबही असते पण खासगी रेल्वे गाड्यांचे भाडे मात्र त्यांत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांच ठरवणार आहेत. सध्या 109 रेल्वे मार्गावर 151 खासगी गाड्या चालवण्याचा प्रस्ताव आहे.