मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन चिंतेत आहे तर दुसरीकडे खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेऊन प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान अशाच खासगी डॉक्टर्सना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या 15दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी आणि सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील , औषधी लोकांना मिळतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः: शेतीच्या कामासाठी जा ये करणारे याना अडथळा होणार नाही हे पाहावे, असं ते म्हणाले.
राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ , त्यांना लॉक डाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.