मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गर्दीमुळे हा व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्याच पार्श्वभमूमीवर आज राज्य सरकार आणि राज्यातील खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा करण्यात आल्या.
राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली असून यात लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. जवळपास 25 कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या वाहिन्यांवरुन करोना व्हायरस विषयी जनजागृती करण्यास तयार आहेत असे टोपे म्हणाले. त्याशिवाय सीएसआर फंडातून मास्क, सॅनिटायझर्स आणि आयसोलेशन वॉर्ड उभारणीसाठी सुद्धा निधी उपलब्ध करुन देण्याची या कंपन्यांनी तयारी दर्शवल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
मंत्रालयातील कर्मचारी करोना बाधीत नाही. मंत्रालयातील गर्दी बंद केली आहे. बाहेरच्या लोकांना मंत्रालयात येऊ दिले जात नाही. मंत्रालयात गर्दी होऊ नये, कर्मचाऱ्यांचीही गर्दी होऊ नये. काही का थांबवता येतील का हे पाहू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्र्यांनी बोलतना त्यांनी स्पष्ट केले.