सातारा – कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला व मानाची गदाही मिळवली. मात्र, त्याला रोख रकमेचे बक्षीस दिले गेले नव्हते. हे वृत्त समोर आल्यावर लगेचच राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची माहिती घेतली जाईल व जर शासनाची ही जबाबदारी असेल तर ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे.
पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला पराभूत करत मानाची गदा मिळवली. मात्र, या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याने पृथ्वीराजने खंत व्यक्त केली होती.
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पृथ्वीराजने कोल्हापूरला गदेचा मान मिळवून देताना इतिहास घडवला. मात्र, त्याला बक्षीसच न मिळाल्याने सर्व स्तरांवरून संताप व्यक्त केला जात आहे. ही उपेक्षा गंभीर असून, शासन यात त्वरित लक्ष घालेल, असेही देसाई यांनी म्हटले आहे. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातून येतात. यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेलीच पाहिजे, असे मत विविध मल्लांनी व्यक्त केले.
पृथ्वीराजला रोख बक्षीस दिले गेले नसेल तर त्याची माहिती घेतली जाईल तसेच बक्षीस देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिले जाईल आणि जर ही जबाबदारी आयोजकांची असेल तर आयोजकांना सूचना दिल्या जातील, असेही ते म्हणाले.
फुल ना फुलाची पाकळी द्या – पृथ्वीराज
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली. मात्र, त्याचवेळी रोख बक्षीस मात्र मिळाले नाही. निदान फुल ना फुलाची पाकळी तरी द्यायला हवी होती, अशा शब्दांत किताबाचा मानकरी ठरलेल्या पृथ्वीराज टापीलने आपली नाराजी बोलून दाखवली.
गृहराज्यमंत्र्यांकडूनही धनादेश
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला आहे. स्वर्गीय शिवाजीराव देसाई ट्रस्टतर्फे शंभुराज देसाई यांनी पृथ्वीराजला हा धनादेश दिला आहे.
संजय पाटील यांच्या स्मरणार्थ लाखाचा धनादेश
दिवंगत महाराष्ट्र केसरी विजेते संजय पाटील यांच्या स्मरणार्थ पृथ्वीराजला एक लाख रुपयांचा धनादेश पुरस्कार वितरणावेळी प्रदान करण्यात आला. संजय पाटील यांचे बधू व हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या हस्ते पृथ्वीराजला हा धनादेश सुपूर्त करण्यात आला.