पुणे – “शेल’ कंपन्यांमध्ये गुंतवलेले वीस हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय संबंध आहेत, याचा खुलासा जोपर्यंत पंतप्रधानांकडून होत नाही, तोपर्यंत कॉंग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. या विरोधात लवकरच पक्षाकडून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्रातील भाजपविरोधात संपूर्ण देशात कॉंग्रेस नेत्यांनी जनतेपुढे जाऊन परिस्थिती कथन करण्याला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार आणि दीप्ती चवधरी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सरकार करत आहे. सन 2019 मध्ये कर्नाटक मध्ये एका सभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनेच ती स्थगित ठेवण्याची विनंती न्यायालयास केली होती. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
मागील महिन्यात अधिवेशनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अदानी उद्योग समूहाबाबत तीन प्रश्न विचारले. त्याला घाबरून लगेचच न्यायालयातील या प्रकरणाचा निकाल लावला गेला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. 160 वर्ष जुन्या असलेल्या कायद्यातील ज्या गुन्ह्याच्या शिक्षेचा वापर केला गेला नाही, त्याचा वापर आता करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.
संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. तो जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आज आमचा प्रयत्न आहे. जोपर्यंत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या तीन प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी देणार नाहीत, तोपर्यंत कॉंग्रेस गप्प बसणार नाही. सध्यातरी सगळीकडे याविषयी नागरिकांना जागृत केले जात आहे. याविषयात पुढील दिशा येत्या काळात ठरवली जाईल, असेही चव्हाण यांनी नमूद केले.