चेन्नई – तीन वेळेचे जेवण, सुरक्षित आश्रयस्थान आणि काही समविचारी मित्रांची साथ यामुळेच तामिळनाडूमधील ज्ञानप्रकाश या कैद्याचे मन घरापेक्षा तुरुंगात जास्त रमते. चोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 52 वर्षांच्या ज्ञानप्रकाशची नुकतीच सुटका झाली होती. मात्र, तुरुंगातील आठवणीने व्याकुळ झालेल्या ज्ञानप्रकाश याला पुन्हा तुरुंगात जाण्याची ओढ लागली.
त्यासाठी त्याने रस्त्यावरील बाईक चोरली. सीसीटीव्हीमध्ये आपला चेहरा दिसेल, याची काळजी घेतली. त्यानंतर पोलीस आपल्याला अटक करायला कधी येतील,याची वाट तो बघत होता. घरातील कुटुंबीय आपली काळजी घेत नाहीत. तुरुंगात आपल्याला घरच्यापेक्षा खूप सुरक्षित आणि चांगले वाटते, असे त्याने पोलीसांना सांगितले. त्यामुळे आपल्याला तुरुंगातच राहावे वाटते, असे त्याने सांगितले.
तुरुंगात मैत्री झालेल्या काही मित्रांना भेटण्याचीही इच्छा होती, असे तो म्हणाला. चोरीच्या आरोपामुळे त्याला मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती. मात्र, 29 जूनला तुरुंगाबाहेर पडल्यानंतर आपल्या खडतर जीवनाला सुरुवात झाली असे त्याने पोलिसांना सांगितले. आपली बायको आणि मुले आपली हेटाळणी करतात. घरी वेळच्यावेळी जेवणही मिळत नाही. त्यामुळे आपल्याला पुन्हा तुरुंगात यायचे होते, असेही तो म्हणाला.