औरंगाबाद – शहरातील हर्सूल कारागृहातील अनोखा प्रकार समोर आला आहे. खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आपली बायको भेटायला येत नसल्याच्या कारणाने अन्न त्याग केल्याचे बघायला मिळाले आहे. कैद्याच्या अन्न त्यागामुळे कारागृह प्रशासनाची विनाकारण डोकेदुखी वाढली.
काटकर चव्हाण असे या कैद्याचे नाव असून खुनाच्या गुन्ह्यात मागील साडेचार वर्षांपासून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात आहे. गेल्यावर्षीपासून बायको आणि मुले भेटायला येत नाहीत, फोनवर बोलत नाहीत. यातच तिने दुसऱ्यासोबत लग्न केल्याने म्हणून काटकर याने कारागृहात अन्नत्याग केले.
काटकर याने अन्नत्याग केल्याने त्याची तब्बेत खालावली असून त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो उपचार घेत नव्हता. शेवटी कारागृह प्रशासनाने थेट काटकरच्या सासरी संपर्क केला व त्याची बायको, मुले आणि सासू-सासऱ्यांना बोलावून घेत त्यांची भेट घडवून आणली. त्यानंतर त्याने अन्नग्रहण केल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
काटकर याला अटक केल्यापासून त्याची बायको मुलाबाळांसह माहेरी माळी जळगाव (नगर) येथे गेली आहे. वर्षभरापासून काटकर आणि त्याची पत्नी, मुलांची भेट झाली नाही. शिवाय पत्नी त्याच्यासोबत मोबाइलवरही बोलत नव्हती. १५ ते २० दिवसांपूर्वी त्याने सासुरवाडीत फोन केला तेव्हा त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केल्याचे त्याला सांगण्यात आले. मुलांसोबतही त्याचे बोलणे झाले नाही. यामुळे त्याने ३ जूनपासून जेवण घेणे बंद केले. प्रशासनाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते.