नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या काळात देशातील कामगारांवर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या, दावा केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी केला. ते म्हणाले की, या काळात बांधकाम क्षेत्रातील दोन कोटी कर्मचाऱ्यांना 5 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली.
ते म्हणाले की, बऱ्याच छोट्या कंपन्यांतील 2 लाख कामगाराचे 295 कोटी रुपयांचे वेतन थकले होते. हे वेतन देण्यासाठी कामगार मंत्रालयाने पुढाकार घेतला. लॉकडाऊनच्या काळात कामगारावर विशेषत: स्थलांतरित कामगार परिणाम झाल्याबद्दल टीका होत आहे. यानंतर गंगवार यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कामगार मंत्रालयाने या काळात सर्व कामगारांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न केले.
राज्यातील कामगार विभागांना कामगारांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. स्थलांतरित कामगारांमध्ये सर्वात जास्त संख्या बांधकाम कामगारांची होती. या कामगारांच्या कल्याणासाठी काही निधी आहेत. या निधीमधून या कामगारांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन कोटी कामगाराच्या खात्यामध्ये 5000 कोटी रुपये देण्यात आले.
कामगार हा विषय केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विषयपत्रिकेवरील आहे. लॉकडाऊनच्या काळात देशात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली असताना केंद्र आणि राज्य यांनी समन्वयाने ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केला. कामगारांची नोंदणी साधारणपणे राज्यातच होत असते.
मात्र यावेळी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कामगारांची नोंदणी केली व कामगारांना परत जाण्यासाठी मदत केली.
मदतीसाठी नियंत्रण कक्ष
या काळात कामगारांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. देशभरातील कामगारांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी या नियंत्रण कक्षाचा वापर केला, असे गंगवार म्हणाले.